विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा पारंपारीक दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर जमले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेगवेगळ्या विषयांवर संबोधित केलं.
राम मंदिराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिराच्या मागणीवर आम्ही आजही थाम आहोत. राम मंदिराच्या उभारणीसाठी विशेष कायदा करावा लागला तरी चालेल. राम मंदिरावरून आम्ही मतांचं राजकारण करत नाही. लोकभावनेचा विचार करुन आम्ही ही मागणी करत आहोत. सुप्रीम कोर्टानं राम मंदिराच्या निर्मितीचा निर्णय दिला तर ठीक नाही तर विशेष कायदा करा आणि राम मंदिर उभारा ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भाजपाला पाठिंबा नाही द्यायचा तर मग कुणाला पाठिंबा द्यायचा? कलम 370 काढू नका म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार आणि इतर मंडळींचं टार्गेट जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपलं टार्गेट तेच लोक राहणार. जे सुडाचं राजकारण करतील त्यांना चिरडून टाकू. आमचा कारभार कसा असेल तर प्रभू रामचंद्रासारखा असेल, जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. प्राण जाए पर वचन ना जाए ही शिवसेनेची निती आहे, ही शिवसेनेची वृत्ती आहे, अशा प्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीला ठणकावलं.
अजित पवार यांचा देखील उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रू आठवले. तुम्ही आता शेती करणार म्हणता आहात. पण, पाणी लागलं आणि धरणावर जायची गरज पडली तर काय करणार? आता तुम्ही रडता आहात, मात्र माझा शेतकरी जेव्हा तुमच्याकडे मदत मागायला आला होता तेव्हा तुम्ही धरणाच्या पाण्याबाबत काय वक्तव्य केलं होतं? ते आठवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहोत. नवं सरकार आल्यानंतर गरीबांना १० रुपयांमध्ये थाळी देणार आहोत. ३०० युनिटपर्यंतच्या वीजेचा भाव ३० टक्के कमी करू. १ रुपयांमध्ये आरोग्याची चाचणीची सुविधा देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं. फक्त निवडणुकांसाठी आश्वासन दिली नाही तर लोकांशी कायम प्रमाणिक राहू असंही त्यांनी स्पष्ट केलं.