भाजपचे नेते जेव्हा तुमच्या दारात मतं मागायला येतील, तेव्हा त्यांना दारातसुद्धा उभं करू नका, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलं. राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत बोलताना पवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली.
भाजप सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा सरकारने कांदा निर्यातबंदी करून टाकली. आम्ही सत्तेत असताना एकाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत होतो, पण आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढूनसुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. भाजपच्या सरकारनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. शेतकरी आणि शेती यांच्याशी कुठलीही आस्था नसलेलं हे सरकार आहे. त्यामुळे मत मागायला आल्यावर त्यांना दारातही उभं करू नका,' असं पवार म्हणाले.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक कारखाने बंद पडले आहेत. लोकांचे रोजगार गेले. देशातल्या धनिकांनी बँकांचे पैसे थकवले आणि सरकारने या बँकांची ७८ हजार कोटींची थकबाकी भरली. पंतप्रधान मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन सगळा देश बँकांच्या बाहेर उभा केला. या रांगात अनेक लोकांचे बळी गेले. तर नोटबंदी होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधित लोकांनी काळ्या पैशांची विल्हेवाट लावली, असे आरोपही पवार यांनी केले.
सोबतच त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवरही टीका केली. पक्ष बदलणाऱ्यांची मला चिंता नाही कारण त्यांच्यापासून आमची सुटका झाल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला.
हेही वाचा-
खडसे ३ महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या संपर्कात, असं का म्हणाले शरद पवार?
ईडीच्या कार्यालयात जाण्याचा शरद पवार यांचा निर्णय रद्द