उपोषणाचा पंधरावा दिवस, आंदोलकाची पाऊलं मुंबईकडे वळू लागली

सकल मराठा समाजाच्या १७ आंदोलकाचं विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे. शुक्रवारी उपोषणाचा १५ वा दिवस असून संभाजी पाटील यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांची तब्येत खालावली आहे. तरीही सरकारला जाग आली नसल्याचं म्हणत राज्यभरातील मराठा आंदोलक उपोषणकर्त्याच्या पाठिंब्यासाठी मुंबईकडे येऊ लागले आहेत. आतापर्यंत ५०० आंदोलक आझाद मैदानावर जमले असून १९ नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलक मांत्रालयावर धडकतील, अशी माहिती नवनाथ पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

काय आहेत मागण्या?

मराठा आंदोलनादरम्यान प्राणांची आहुती देणाऱ्या ३९ आंदोलकांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत मिळावी आणि मराठा आंदोलकावरील गंभीर गुन्हे मागे घ्यावेत या आंदोलकाच्या मुख्य मागण्या आहेत. मात्र यावर अजूनपर्यंत राज्य सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन उपोषणकर्त्यांना मिळालेलं नाही. त्यामुळे प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही संभाजी पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपोषणावर ठाम आहेत.

'करो वा मरो'

आता सरकारला जागं करण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत धडकणार असल्याचं नवनाथ पाटील यांनी सांगितलं आहे. त्यानुसार सध्या आझाद मैदानावर ५०० आंदोलक आले असून हिंगोली, परभणी, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, सोलापूर अशा विविध भागातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सोमवारी १९ पर्यंत मुंबईत मोठ्या संख्येने मराठा बांधव जमतील आणि थेट मंत्रालयावर धडकतील. हा मोर्चा 'करो वा मरो' चा असेल. मागण्या मान्य झाल्याशिवाय हलणार नाही, असा इशारा ही नवनाथ पाटील यांनी दिला आहे.


हेही वाचा- 

उपोषणाचा बारावा दिवस, १९ नोव्हेंबरला मराठा बांधव धडकणार मंत्रालयावर

काय आहे मराठा आरक्षण अहवालात? वाचा...


पुढील बातमी
इतर बातम्या