शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरते. हा भित्रेपणा लपवण्यासाठी वृत्तपत्रात संपादकीय लिहून मोदींवर टीका करण्याचं सत्र सध्या शिवसेनेने अवलंबलं आहे. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी संपादकीय लिहिण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी, असं आव्हान दिलं आहे, 'एमआयएम'चे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी.
'ओवेसी राम मंदिरच्या मुद्द्यावर वक्तव्य करत सुटलेत. पण ओवेसी यांनी स्वत: ला हैदराबादपुरतंच मर्यादित ठेवावं. राम मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे, हैदराबाद, पाकिस्तान किंवा इराणमध्ये नाही! ओवेसी यांच्यासारखे नेते राजकारणाच्या नावाखाली मुस्लिम समुदायाला चुकीच्या दिशेने भरकटवत आहेत. भविष्यात त्यांना याचा फटका बसेल', असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ओवेसी यांनी उद्देशून केलं होतं.
त्याला उत्तर देताना ओवेसी म्हणाले की, शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरते. हा भित्रेपणा लपवण्यासाठी शिवसेनेने वृत्तपत्रात फक्त अग्रलेख लिहण्याची नीती अवलंबली आहे. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी अग्रलेख लिहिण्याचं थांबवून मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधून बाहेर पडावं. माझे पूर्वजही भारतीयच होते, हे मी सिद्ध करू शकतो.'
सामना वृत्तपत्रात लिहिलेल्या अग्रलेखात ''राममंदिर निर्माणासाठी सरळ एक कायदा करा. अध्यादेश काढा व मंदिरनिर्माणाचे कार्य सुरू करा. राममंदिराचा ‘वायदा बंद, कायदा सुरू’ असे झाले तरच हे कार्य पुढे जाईल. बाबरी-राममंदिराचे राजकारण कायमचे बंद करायचे असेल तर २०१९ पूर्वी कायद्याने राममंदिर उभे करा ही शिवसेनेची मागणी म्हणजे हिंदू जनभावनेचा स्फोट आहे.'' असं मत मांडण्यात आलं आहे.
हेही वाचा-
तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत
आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर बांधण्याचा विचार करा- नारायण राणे