मराठी माणसासाठीच लढणारा पक्ष म्हणून जन्माला आलेल्या आणि राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मूळ मुद्द्यावरच एमआयएम पक्षाचे आमदार वारीस पठाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईत शिवसेना, मनसेने मराठी माणसासाठी काय केलं आहे? असा प्रश्नच त्यांनी 'मुंबई लाईव्ह'च्या विशेष मुलाखतीमध्ये विचारला आहे. शिवाय, वंदे मातरम् म्हणण्याविषयी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
आत्तापर्यंत शिवसेना, मनसे या पक्षांनी फक्त मारझोडीचं राजकारण केलं असून मराठी माणसासाठी खरं काम तर एमआयएम करत असल्याचा जोरदार दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. मुंबईत ज्या ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, तिथे एमआयएमनं विकासकामं केल्याचंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, मुंबईत मनसेनं फेरीवाल्यांविरोधाच छेडलेल्या आंदोलनावर भूमिका घेताना 'मारझोडीचा अधिकार यांना कुणी दिला' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट अवैध वाटत असेल, तर तिच्याविरोधाच कोर्टामध्ये याचिका करायला हवी असं ते यावेळी म्हणाले.
एकीकडे एमआयएमचे आमदार आणि पेशाने वकील असलेल्या वारीस पठाण यांनी मनसेसाठी कोर्टात जाण्याचा सल्ला दिला असला, तरी दुसरीकडे मात्र त्यांनीच केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा पुनरूच्चार केला आहे. 'माझ्या एका गालावर कुणी मारलं, तर मी दुसरा गाल पुढे करणार नाही, तर समोरच्याचं तोंडच फोडेन' अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं आहे.
दरम्यान, एकीकडे मनसेच्या आंदोलनाला विरोध करतानाच दुसरीकडे अनधिकृत फेरीवाले किंवा झोपडपट्टीवाल्यांना अनधिकृतच म्हणत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला असून त्यावर सुप्रीम कोर्टाने न्यायालयाबाहेरच हा मुद्दा सोडवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, यातून जो काही निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल, तो निर्ण एमआयएम पार्टी आणि स्वत: आपल्यालाही मान्य असेल, असं ते यावेळी म्हणाले.
एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी या मुलाखतीदरम्यान वंदे मातरम् सोबतच अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांची संपूर्ण मुलाखत पहाण्यासाठी इथे क्लिक करा:
हेही वाचा