खडसे आल्याने कुणीही नाराज नाही- शरद पवार

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने कुणीही नाराज झालेलं नाही. कुणाच्याही कामात बदल होणार नाही. जे आहेत ते तिथंच राहतील. उलट एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंचं पक्षात स्वागत केलं. खडसे यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी भाषण करताना शरद पवार म्हणाले, नवी पिढी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. काही ठिकाणी पक्षाची शक्ती वाढवण्याची गरज आहे. तो विचार करताना खान्देश माझ्या नजरेसमोर येतो. धुळे, जळगाव, नंदूरबारमध्ये काम करण्याची गरज आहे. एक काळ असा होता की जळगाव जिल्हा देखील राष्ट्रवादी विचारांचा होता. मात्र हा विचार नंतर मागे पडला, त्यामुळे भाजपाची ताकद वाढली. जळगावात भाजप मोठा होण्यामागे एकनाथ खडसे यांची मेहनत होती. मात्र त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. (ncp chief sharad pawar praises eknath khadse)

हेही वाचा - पहाटे शपथ घेताना तुम्हाला राष्ट्रवादी चालते, मग मला का नाही?- एकनाथ खडसे

खान्देशात राष्ट्रवादीचं काम सुरू आहे. नाथाभाऊंच्या निर्णयामुळं या कामाला खऱ्या अर्थानं गती येईल. एखादी गोष्ट करायची म्हटल्यावर मागेपुढे पाहायचं नाही ही खडसेंच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरणार आहे. 

राष्ट्रवादीत येताना खडसेंनी एका शब्दानंही माझ्याकडे कोणती अपेक्षा व्यक्त केलेली नाही. खडसेंच्या प्रवेशामुळे अजितदादा नाराज असल्याचं कुणीतरी जाहीर करून टाकलं. मला त्याचं आश्चर्य वाटलं. कोरोनामुळं आपल्या अनेकांना त्रास झाला. त्यामुळं आपण खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं कुणी सहकारी इथं दिसला नाही तर काही गडबड झाली अशी चर्चा सुरू होते. ती चुकीची आहे. पक्षात काहीही बदल होणार नाही. जे जिथं आहेत, ते तिथंच काम करत राहतील, असं म्हणत शरद पवार यांनी मंत्र्यांच्या फेरबदलाची शक्यताही फेटाळून लावली.

हेही वाचा - खडसेंना राष्ट्रवादीत घेण्यामागे पवारांचं राजकीय गणित पक्कं- संजय राऊत

पुढील बातमी
इतर बातम्या