पवारांनी मानले शिवसेनेचे आभार

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंमलबजावणी संचलनालया (ED)च्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केला. हा निर्णय रद्द करतानाच पवार यांनी कठीण परिस्थितीत पाठिंबा देणाऱ्यांचे आभारही मानले. ज्यात त्यांनी चक्क राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेनेचाही न विसरता उल्लेख केला. 

कारवाईमागचा हेतू काय?

शरद पवार हे केवळ महाराष्ट्राचे नेते नसून ते देशातील एक महत्त्वाचे नेते आहेत. शरद पवारांचे संबंधित प्रकरणात नाव नसतानाही जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर लोकांच्या मनात शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

निर्णय बदलला

राज्य शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्यासहीत ७० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. बँकेचा संचालक वा सभासद नसतानाही आपल्यावर गुन्हा कसा नोंदवण्यात आला, हे विचारण्यासाठी पवार यांनी स्व:हून ईडी कार्यालयात जाण्याचं ठरवलं. परंतु चौकशीसाठी समन्स बजावलेलं नसताना कार्यालयात येऊ नये, असं ईडीने पवार यांना कळवलं. तरीही पवार आपल्या निर्णयावर ठाम होते. परंतु राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पवार यांनी ईडी कार्यालयात जाऊ नये, अशी विनंती मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी केल्यावर पवार यांनी आपला निर्णय बदलला. 

राजकीय हेतूने प्रेरीत

यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माझ्यावर केलेली कारवाई राजकीय हेतूनं प्रेरीत आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत असल्याचं पवार म्हणाले. तसंच विविध पक्षांतील नेत्यांनी पवार यांच्यावरील कारवाईवरून भाजपवर टीका केल्याने पवार यांनी पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचे आभार मानले. राजकीय विचारधारा वेगळी असली, तरी महाराष्ट्र अन्याय, अत्याचार सहन करत नाही हे आज दिसले. असं पवार म्हणाले. तसंच पवारांनी पाठिंब्याबद्दल राहुल गांधी, मनमोहन सिंग व संजय राऊत यांचे आभार मानले. 


हेही वाचा-

ईडीच्या कार्यालयात जाण्याचा शरद पवार यांचा निर्णय रद्द

चक्क संजय राऊत शरद पवारांच्या बाजूने राहिले उभे...


पुढील बातमी
इतर बातम्या