जीएसटी विधेयकासाठी शनिवारपासून तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या संदर्भात शुक्रवारी विरोधी पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. तीन दिवसीय अधिवेशन काळात विरोधक शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी यावेळी दिली. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, गणपतराव पाटील, जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी, शरद रणपिसे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
हेही वाचा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. यासाठी राज्यपालांची भेटही घेतली होती. मात्र राज्य सरकारने ही मागणी फेटाळली. राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. त्याबरोबर शेतकऱ्यांची निंदा-नालस्ती कशी करता येईल हे बघितले जात असल्याचे सांगत तटकरे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. हे अधिवेशन मर्यादित स्वरुपाचे आहे. तरी विरोधी पक्ष या नात्याने सभागृहात राज्यातील विविध विषयांवर सरकारचे लक्ष वेधू अशी माहिती तटकरे यांनी दिली. दरम्यान, या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा, शेतमालाच्या भावाचा मुद्दा यावर सरकारचे लक्ष कसे वेधता येईल यावर चर्चा करण्यात आली.