नालासोपारामध्ये सनातन संस्थेचा सदस्य वैभव राऊत याच्या घरी बाॅम्ब अाणि शस्त्रे मिळाल्याने अाता विरोधी पक्षांकडून गंभीर प्रश्न उपस्थित होत अाहेत. बकरी ईदला राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून मोठा हिंसाचार आणि धार्मिक दंगली घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट असल्याचे यातून स्पष्टपणे दिसून येत अाहे, असा अारोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला अाहे.
अाता तरी राज्य सरकार सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या विघातक संघटनांवर बंदी घालण्याची केंद्राकडे मागणी करणार का? अशी संतप्त विचारणाही विखे पाटील यांनी केली आहे.
सनातन आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधीत असलेल्या वैभव राऊतवर पूर्वीपासून दंगलींचे गुन्हे दाखल आहेत. नेमका त्याच्याकडं बॉम्बचा साठा सापडणं आणि त्याच्या बचावार्थ हिंदू जनजागृती समितीने हा ‘मालेगाव पार्ट २’ असल्याचं जाहीर करणं, ही बाब धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचे कारस्थान शिजत असल्याचा स्पष्ट संकेत आहे. या समितीने ‘मालेगाव पार्ट २’ हाच शब्द का निवडावा? असा सूचक प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
केंद्राशी बोलणार का ?
डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्रोफेसर कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्येमध्ये सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या कट्टरवादी संघटनांवर संशय व्यक्त केला जात आहे. या चारही हत्यांसाठी वापरलेली गेलेली पिस्तुले सारखीच होती, हे स्पष्ट झालं आहे. या खटल्यांचा भविष्यात काय निकाल लागेल, हा भाग वेगळा आहे.
मात्र खबरदारीचा उपाय आणि भविष्यातील अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वच कट्टरवादी संघटनांवर तातडीने बंदी घालण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अधिक वेळ न दवडता आणि उदासीन दृष्टीकोन सोडून अशा संघटनांवर बंदी घालण्यासंदर्भात भाजप-शिवसेनेचे राज्य सरकार केंद्राशी बोलणी करणार का? अशी विचारणाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा -
नालासोपाऱ्यात 8 देशी बॉम्ब जप्त, मुंबई एटीएसची कारवाई
मोदींचा मातोश्रीवर 'संपर्क फाॅर समर्थन' काॅल