13 वर्षांनंतर पहिल्यांदाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरे यांचा ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित ठाकरे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला भेट दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज यांनी 2012 मध्ये मातोश्रीला शेवटची भेट दिली होती.
अनेकांनी या भेटीचे स्वागत केलंय तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज यांनी सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत एक कॅप्शन लिहिलीय. यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलंय.
मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे शिवतीर्थवर परतले. यानंतर त्यांनी सोशल मीडियात बंधू भेटीचा फोटो शेयर केला. ज्यावर 'माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...'
केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा विरोध उभा राहिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे आवाज उठवला. या मुद्द्यावर त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याची योजना आखली होती.
परंतु सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर 5 जुलै 2025 रोजी वरळी येथील NSCI डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले, ज्याने त्यांच्या जवळीकीला नवे वळण मिळाले.
दोघांनीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात, "आमच्यातील आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी," असे विधान केले, तर राज ठाकरे यांनी, "कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे," असे सांगितले.
पालिका निवडणुकीसाठी येणार एकत्र?
आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मराठी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि सत्ताधारी महायुतीला (BJP-शिंदे गट) आव्हान देण्यासाठी ही जवळीक महत्त्वाची मानली जाते.
असे असले तरी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
हेही वाचा