खासदारकीचा राजीनामा तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढं चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करत आहेत. त्यांच्या कामानं प्रभावित होऊन मी भाजपशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला,' असं पक्षप्रवेशावेळी उदयनराजे यांनी म्हटलं.
उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशाचा खास सोहळा नवी दिल्लीत पार पडला. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे त्यावेळी उपस्थित होते.
'देश एकत्र, एकसंध व मजबूत कसा राहील, यासाठी मोदी व शहा हे काम करत आहेत. त्यांच्या कामामुळं देशातील प्रत्येक राज्यात भाजपची वाढ होतं आहे. लोक या पक्षात येऊ इच्छित आहेत,' असं उदयनराजे यांनी म्हटलं. काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचंही त्यांनी स्वागत केलं. 'यापुढं मी मोदी, शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपमधील माझ्या सहकाऱ्यांच्या साथीनं समाजासाठी काम करेन,' अशी ग्वाही त्यांनी दिली. तसंच, 'छत्रपती शिवरायांचे वंशज भाजपमध्ये येताहेत याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो,' असं भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.
उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका करत आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घालून काय मिळालं असा प्रश्न उपस्थित केला आहे. आव्हाड यांनी ट्विटरवरून टीका केली असून, साहेब तुम्ही उदयनराजेंवर मनापासून प्रेम केलं सातारातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलत. त्यांच्या सगळ्या आचरट चाळ्यांना पाठिशी घातलंत पोटाच्या पोरावानी प्रेम केलत, खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब काय मिळाले? पण तरीही 'यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला',असं ट्विट त्यांनी केलं.
हेही वाचा -
महाराष्ट्रातील 'या' ३ नेत्यांचं मंत्रीपद वाचलं!