नाहीतर, शेतकऱ्यांच्या रागाचा वणवा देशभर पसरेल- शरद पवार

सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर हा वणवा देशभरात पसरेल. मात्र, आता सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली. आझाद मैदानात पोहोचलेल्या शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

अनेक महिन्यांचा साचलेला राग

शेतकऱ्यांचा आजचा मोर्चा हा गेल्या अनेक महिन्यांच्या रागातून काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांचं दुखणं कोणातरी मांडायची गरज होती, लाल बावट्याने तो पुढाकार घेतला. मात्र, सरकारने आताही त्याची योग्य दखल घेतली नाही, तर हा रागाचा हा वणवा देशभरात पसरेल, असा इशारा पवार यांनी दिला.

जबाबदारी टाळता येणार नाही

शेतकऱ्यांविषयी निर्णय घ्यायला सरकारला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. एकीकडे सरकार उद्योगपतींच्या कर्जामुळे बँकिंग व्यवस्थेत निर्माण झालेला तोटा भरून काढण्यासाठी ८० हजार कोटींचं फेरभांडवलीकरण करत आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार २२ हजार कोटी देऊ शकत नाही. राज्यकर्त्यांनी अशीच बघ्याची भूमिका घेतली तर नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. त्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही, असं पवार यांनी सांगितलं.


हेही वाचा-

शेतकरी मोर्चेकऱ्यांच्या भोजनाची पनवेलकरांनी केली सोय

शेतकरी मोर्चा पूनम महाजनांना शहरी माओवाद वाटतोय!

काठीहल्ला करा नाहीतर गोळ्या घाला, आता माघार नाही! शेतकऱ्यांचा निर्धार


पुढील बातमी
इतर बातम्या