देवेंद्र फडणवीस सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही विधानसभेला घेराव घालू, मग आमच्यावर लाठीहल्ला करा किंवा गोळ्या घाला जराही न डगमगता आम्ही विधानभवनासमोर ठाण मांडू, असं म्हणत शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी सरकारला जेलभरो आंदोलनाचा कडक इशारा दिला आहे.
शेतकरी कर्जमाफीसोबत आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून २०० किलोमीटरची पायपीट करून मुंबईत दाखल झालेले शेतकरी बांधव किसान सभेच्या नेतृत्वाखाली सध्या आझाद मैदानात एकवटले आहेत. लाँग मार्चमुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये, खासकरून दहावी, बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन शेतकरी बांधव सोमवारी पहाटेच आझाद मैदानात दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवल्यास किसान सभेचं शिष्टमंडळ दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. पण संध्याकाळपर्यंत जर आमच्या मागण्यांवर सरकारने काहीच हालचाल केली नाही, तर आम्ही आझाद मैदानातून थेट विधानसभेकडं कूच करू आणि विधानसभेला घेराव घालू. मग कायदा मोडला म्हणून आम्हाला जेलमध्ये टाका, काठीहल्ला करा किंवा गोळ्या घाला, आम्ही त्या झेलायला तयार आहोत, पण कुठल्याही तडजोडीवर मागं हटणार नाही, अशी भूमिका किसान सभेच्या नेत्यांनी घेतली आहे.
किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्यांची एक उच्चस्तरीय बैठक रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी ६ सदस्यीय मंत्र्यांची समिती नेमण्यात आली असून त्यात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा समावेश आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री किसान सभेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी केव्हा बोलवतात आणि त्या भेटीतून काय तोडगा निघतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा-
शेतकरी मोर्चेकऱ्यांना आझाद मैदान परिसरात सार्वजनिक शौचालय नि:शुल्क
चर्चा करू, पण आंदोलन सुरूच राहणार; शेतकऱ्यांचा निर्धार
शेतकऱ्यांचा लाँग मार्च रात्रीच आझाद मैदानात!