पराभवाचे हादरे बसू लागल्याने भाजपने हिंदू-मुस्लीम हुकमी खेळ सुरू केलाय, 'सामना'तून टीका

हिंदू जन आक्रोश मोर्चावरुन शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. पराभवाचे हादरे बसू लागले की, भाजप त्यांचा हुकमी खेळ सुरू करत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे.

हिंदूंनी त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना भवनाचा परिसर निवडला. याचा अर्थ एकच, आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना आणि शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल.

सगळ्यांचे शिवसेनेवर 'लव्ह' आहे व दिल्लीच्या ढोंगी हिंदू सरकारविरुद्ध 'जिहाद' आहे. त्यामुळे 'लव्ह जिहाद'विरुद्धचा त्यांचा आक्रोशही महत्त्वाचा आहे. शक्तिमान हिंदू महाशक्तीचे कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल. असंही सामनात म्हटलं आहे.

हिंदू जन आक्रोश मोर्चे आणि आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा 'आक्रोश मोर्चा' निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे, असा टोलाही सामनातून करण्यात आली आहे.


हेही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर

सत्ता परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून! शिंदे-फडणवीस युतीला मोठा धक्का?

पुढील बातमी
इतर बातम्या