न्यायव्यवस्थेला मुकी, बहिरी करण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे

लोकशाही धोक्यात आल्याचे टीकास्त्र राज ठाकरेंनी सरकारवर सोडल्यावर 'आता फक्त निवडणुका जिंकणे म्हणजे देशाचं कारभार नसतो' असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तोंडसुख घेतले आहे. सुप्रीम कोर्टाच्या त्या चार न्यायाधीशांचे कौतुक करत 'त्यांच्यावर कदाचित कारवाई होऊ शकेल', अशी भीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मात्र, ही कारवाई पक्षपाती असू नये, अशी अाशाही त्यांनी व्यक्त केली.

'निवडणूक जिंकणे म्हणजे देश चालवणे नाही'

कालचा प्रकार अत्यंत धक्कादायक होता आणि ते चार न्यायमूर्ती जे बोलले ते अत्यंत गंभीर असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. देशातील लोक खरंच आपली जबाबदारी पार पाडत आहेत का? असा प्रश्न यातून समोर येत आहे. न्यायदेवतेला मुकी, बहिरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. न्यायव्यवस्थेतील वास्तव समोर आलं आहे आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न लोकांना पडल्याचे ते म्हणाले. फक्त निवडणूक जिंकणे म्हणजे देशाचा कारभार चालवणे होत नाही, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी सरकारला लगावला.

'लोया प्रकरणाची चौकशी व्हावी'

न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हायला हवी. आज लोकशाही धोक्यात असून त्यामुळे वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. हे प्रकरण न्यायमूर्तींनी योग्य प्रकारे हाताळण्याची गरज असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. तसंच, राष्ट्रपती १४ तारखेला मुंबईत येणार आहेत. ते का येत आहेत? त्यांचं मुंबईत असं काय काम आहे? यावर कोणी प्रश्न विचारू नयेत आणि राजकारण करू नये, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


हेही वाचा

मुंबईतील बेकायदा बांधकामे बेधडक तोडा, शिवसेना आयुक्तांच्या पाठिशी- उद्धव ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या