सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१० अंकांनी कोसळून ३४,७५७ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९४ अंकांनी घसरूण १०,६६७ वर आला. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सलग पाचव्या सत्रात शेअर बाजाराने घसरण नोंदवल्याने गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत.
सोमवारी दिवसभरात बँक, आयटी, मेटल आणि रियाल्टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. परिणामी सेन्सेक्स पुन्हा घसरून ३५ हजारांच्या खाली आला. सकाळच्या सुमारास सेन्सेक्स ५४५ आणि निफ्टी १७३ अंकांपर्यंत खाली आला होता. परंतु रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, आयटीसी, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, मारूती आणि पाॅवरग्रीज या हेवीवेट कंपन्यांच्या शेअर्स खरेदीने शेअर बाजाराला पुन्हा पाठबळ दिलं.
शेअर बाजारात लार्जकॅप शेअर्ससोबतच मीडकॅप शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली. बीएसईचा मीडकॅप इंडेक्स २.३३ टक्क्यांनी घसरला. त्यात वक्रांगी १० टक्के, आरकाॅम ६.५१ टक्के, अदानी इंटरप्रायझेस ५.४० टक्के, एल अॅण्ड टी फायनांन्स होल्डिंग ५.१६ टक्के आणि अदानी पाॅवरमध्ये ४.७४ टक्क्यांची घसरण झाली.
अर्थसचिव हसमुख अढीया यांनी लाॅन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावल्यामुळे नाही, तर ग्लोबल बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण झाल्याचं म्हटलं, तर शेअर बाजारातील जाणकारांच्या मते ही घसरण प्रामुख्याने लाॅन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या घोषणेनंतर गुंतवणूकदार बाजारातून फायदा काढून घेत असल्याने होत आहे.
हेही वाचा-
लाॅन्गटर्म गेन टॅक्सच्या घोषणेने सेन्सेक्स घसरला
सेन्सेक्स ८४० अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे ४.५७ लाख कोटी सपाट