तृतीयपंथी म्हटलं की आजही अनेकांच्या भुवया काहीशा उंचावतात. अनेकदा त्यांच्याकडे हीन नजरेनं पाहिलं जातं. भीक मागून त्रास देणारे, पैसे नाही दिले म्हणून चिडचिड करणारे अशी तृतीयपंथींची प्रतिमा आपल्या मनात असते. मात्र, दिवसागणिक या परिस्थितीत फरक पडत आहे. तृतीयपंथींना देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच प्रत्यय नवी मुंबईच्या 'थर्ड आय कॅफे'त आला.
एकविसाव्या शतकातल्या प्रगतीशील समाजाच्या आपण कितीही बाता मारल्या, तरी तृतीयपंथींकडे आजही वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. मात्र, नवी मुंबईतल्या एका रेस्टॉरंटनं तृतीयपंथीयांच्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. निमिश शेट्टी, प्रसाद शेट्टी आणि नितेश कंदरकर या तिघांनी एकत्र येत थर्ड आय कॅफे सुरू केला आहे. हे तिघेही वेगवेगळ्या क्षेत्रातून आले आहेत. निमिश आर्किटेक्चर क्षेत्रातून, प्रसाद मार्केटिंग क्षेत्रातून तर नितेश बँकिंग क्षेत्रातून आला आहे. तिघांचं क्षेत्र जरी वेगळं असलं, तरी त्यांचा कॅफेमागील उद्देश मात्र एकच होता आणि तो म्हणजे तृतीयपंथींना समाजात मानाचं स्थान मिळवून देणं!
२०१३ पासून मी ट्रान्सजेंडर्सवर काम करत होतो. मुळात या समाजाच्या काय समस्या आहेत? यावर मी आभ्यास केला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की तृतीयपंथींसाठी काही करायचं असेल तर आम्हाला रोजगार निर्मिती करावी लागेल. सो आम्ही एक रेस्टॉरंट सुरू करून तृतीयंपंथींना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ दिलं. थर्ड जेंडरसाठी असणारा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही 'थर्ड आय' हे नाव कॅफेला दिलं. आम्हाला यामध्ये गौरी सावंत यांची देखील खूप मदत झाली.
निमिश शेट्टी, मालक, थर्ड आय कॅफे
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात थर्ड आय कॅफेची सुरुवात झाली. सध्या कॅफेत ६ तृतीयपंथी काम करत आहेत. माही, जोया, सोनाली, जोजीन, निहारिका अशी यांची नावं आहेत. वेटरपासून ते ग्राहकांच्या स्वागतापर्यंत सर्व कामं तृतियपंथी संभाळतात. याशिवाय त्यांच्यावरच किचनची जबाबदारी देखील असते. या सर्वांना ट्रेनिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे आत्मविश्वासानं ते या कॅफेत काम करत आहेत. या कॅफेत एकूण २० कर्मचारी काम करत आहेत.
मी दोन-तीन महिन्यांपूर्वीच इथं जॉईन झाले आहे. सुरुवातीला आम्हाला सर्व ट्रेनिंग दिली गेली. ग्राहकांशी कसं बोलायचं? ऑर्डर कशी घ्यायची? कामाला सुरुवात केली तेव्हा मनात भिती होती की, लोकं आम्हाला स्विकारतील की नाही. पण लोकांनी आमचा स्विकारच नाही, तर आमचं कौतुक देखील केलं.
यापूर्वी आम्हाला कुणीच एवढा मान दिला नाही. माझं सांगायचं झालं तर घरच्यांनी देखील माझा स्विकार केला नाही. गुजराण करण्यासाठी रस्त्यावर पैसे मागायचो. पण आता परिस्थिती पूर्णत: बदलेली आहे.
मंगेश नगरकर, कर्मचारी
सुरुवातीला माही, जोया, सोनाली आणि निहारिका यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी थोडी भिती होती. परिस्थितीमुळे यांच्यापैकी काही जणांचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे इंग्रजीत बोलणं त्यांना थोडं अवघड जात होतं. त्यामुळे कॅफेत फक्त हिंदीतच बोलायचं, असा नियम आम्ही काढला. कारण हिंदी ही भाषा सर्वांनाच येते.
तृतीयपंथीयांना व्यासपीठ देण्यासाठी फक्त बाता न मारता प्रत्यक्षात या तिघांनी योग्य पाऊल उचललं आहे. नक्कीच या तिघांचा आदर्श इतरांनी देखील घ्यावा.