मुंबईच्या युवा बुद्धिबळपटूंची श्रीलंकेत चमक

जयवर्धन राज अाणि अार्यवीर अगरवाल या मुंबईतील उभरत्या बुद्धिबळपटूंनी श्रीलंकेतील सिट्रस हाॅटेलमध्ये रंगलेल्या १४व्या अाशियाई स्कूल्स बुद्धिबळ अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत चमक दाखवली. जयवर्धनने सुवर्णपदकाला गवसणी घातली तर अार्यवीरने रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत विविध गटात १७ देशांतील ४५० पेक्षा अधिक बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता.

जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूलमध्ये शिकणाऱ्या जयवर्धनने मुलांच्या ७ वर्षांखालील गटात रॅपिड प्रकारात सुवर्णपदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जयवर्धनने एकाही सामन्यात प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करला नाही. त्याउलट सहा प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सातपैकी ६.५ गुण पटकावून त्याने विजेतेपद प्राप्त केले. जयवर्धनने गेल्या महिन्यात महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतही छाप पाडली होती.

अार्यवीरने मुलांच्या ७ वर्षांखालील गटात ब्लिट्झ प्रकारात ७ पैकी ५.५ गुण मिळवून रौप्यपदक पटकावले. साउथ मुंबई चेस अकॅडमीमध्ये प्रशिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या अार्यवीरने शेवटच्या फेरीत कझाकस्तानच्या अव्वल मानांकित तुलेनडिनोव्ह दिनमुखामेद याला बरोबरीत रोखले. या अर्ध्या गुणामुळे अार्यवीरसह चौघांचे ५.५ गुण झाले होते. मात्र सरस गुणांच्या अाधारे अार्यवीरला रौप्यपदक देऊन गौरविण्यात अाले. जयवर्धन, अार्यवीरच्या या कामगिरीमुळे टीम इंडियानेही सुवर्णपदक प्राप्त केले.


हेही वाचा -

राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत नुबेरशाह शेखला रौप्यपदक

युवा बुद्धिबळपटू निवानचा नितीन गडकरींच्या हस्ते सन्मान


पुढील बातमी
इतर बातम्या