लोकलच्या धडकेने एकाच कुटुंबातील ४ तरूणांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • परिवहन

गावाहून घरी परतत असताना ४ तरूणांचा बोरीवली-कांदिवली दरम्यान लोकलची धडक बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे घडली. सागर संपत चव्हाण (२३), साईप्रसाद मनोहर चव्हाण (१७), मनोज दिपक चव्हाण (१७) आणि दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (२०) अशी या चौघांची नावे आहेत. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ असून दोघे त्यांचे चुलत भाऊ आहेत.

नेमका कसा झाला अपघात?

कांदिवलीतील पोईसर इथं राहणारा सागर चव्हाण कणकवलीत राहणाऱ्या आपल्या ३ नातेवाईकांना घेऊन गावाहून घरी परतत होता. दादरहून बोरीवली लोकल पडकल्यानंतर हे चौघेही जण पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कांदिवली इथं पोहोचले. 

त्यानंतर बोरीवली लोकल पोईसर इथं सिग्नलला थांबली असताना या चौघांनी घाईघाईने लोकलमधून खाली रुळावर उड्या मारल्या. तेवढ्यात रेल्वे रूळ अोलांडत असताना चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची जोरदार धडक बसून या चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

अपमृत्यूची नोंद

सकाळी ५.३८ वाजता चौघांचे मृतदेह रेल्वे रुळांवर पडल्याची माहिती स्टेशन उप अधिक्षक, बोरीवली रेल्वे स्थानक यांना मिळाल्यानंतर या चौघांचे मृतदेह उचलून कांदिवलीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

घातपाताचा संशय

या चौघांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. बोरीवली रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असली, तरी त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला आहे. मात्र रेल्वे रुळांनजीक सीसीटीव्ही नसल्याने तपास करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.


हेही वाचा-

'त्या' व्यक्तीला भरपाई द्या' : सुप्रीम कोर्टाचे रेल्वे प्रशानाला आदेश


पुढील बातमी
इतर बातम्या