कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी अखेर सोमवार १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. प्रवाशांसाठी नियम व अटी घालूनच ही लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, लोकल प्रवासा दरम्यान, तोंडाला मास्क लावणं, सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र तरिही अनेक प्रवासी हे विनामास्कच प्रवास करत आहेत. अशा अनेक प्रवाशांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे.
लोकलमधून प्रवास करण्यासाठी मास्कविना स्थानकात दाखल झालेल्या ५७१ प्रवाशांविरोधात सोमवारी रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. दंड आकारून या प्रवाशांना स्थानकातून माघारी पाठवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा बलानं (आरपीएफ) महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीनं ही कारवाई केली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५७१ प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला.
पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे ४०० प्रवाशांना पकडण्यात आलं आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. तसंच, मास्कशिवाय स्थानक परिसरात आलेल्या २३७ प्रवाशांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा -
मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात; प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ
मुंबईतील 'या' चौपाटीवर होणार दर्शक गॅलरी