बेस्ट ‘या’ मार्गांवरही चालवणार बस

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच (best bus service for private company employees) खासगी कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बेस्ट प्रशासनाने सोमवार ८ जून २०२० पासून सेवा पुरवण्याचं ठरवलं आहे. ही सेवा देताना मुंबईबाहेरील कर्मचाऱ्यांसाठीही बस चालवण्याचा विचार बेस्ट प्रशासनाने केला आहे. जेणेकरून मुंबई शहर आणि उपनगराबाहेरुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सोयीचा होऊ शकेल.  

प्रवाशांची सोय

त्यानुसार सोमवारपासून बेस्टच्या काही बस या विरार, नालासोपारा, कल्याण, बदलापूर आणि पनवेल परिसरातून देखील चालवण्यात येतील. मुंबईत अनेक लहान-मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयात काम करण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरा बाहेरू देखील मोठ्या संख्येने कर्मचारी येतात. या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मुंबई महानगर परिसरात बस चालवण्याचं बेस्ट प्रशासनाने ठरवलं आहे, अशी माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी दिली. 

हेही वाचा- आॅफिस कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची ८ जूनपासून सेवा सुरू

१० टक्के मनुष्यबळासह

महाराष्ट्र सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सोमवार ८ जूनपासून मुंबईच्या रस्त्यांवर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट बस पुन्हा धावणार आहेत. तब्बल अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळाहून बेस्ट बसची सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांसाठी पूर्णपणे बंद होती.

येत्या ८ जूनपासून खासगी कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुलभपणे ये-जा करता यावी म्हणून राज्य सरकारने जारी केलेल्या सुधारीत मार्गदर्शक नियमावलीनुसार मुंबई महानगर परिसर प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे. याचाच अर्थ मुंबईसहीत, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, पनवेल परिसरातील कुठल्याही कर्मचाऱ्याला कामानिमित्त प्रवास करता येणार आहे. त्याच जोडीला बेस्ट बसची सुविधा मिळाल्यास या कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे.

हेही वाचा- बेस्टच्या २०० कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात
पुढील बातमी
इतर बातम्या