मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या तब्बल ८० फेऱ्या वाढणार

मध्य रेल्वेवर पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलच्या ८० हून अधिक फेऱ्या वाढणार आहेत. मात्र या सर्व फेऱ्या एसी लोकलच्या असणार आहेत. नवीन वेळापत्रक भरून काढण्यासाठी एसी लोकल चालवल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वेवरील सर्व लोकल या एसी लोकल करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, गेल्या रविवारी मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून ते मध्यरात्री दोनपर्यंत ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. या ब्लॉकसाठी लोकलच्या १६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसंच अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या होत्या.

ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. गेल्या रविवारी मध्य रेल्वेवर सकाळी ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला.

त्याआधी मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या पाहणी आणि मंजुरीनंतर हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गिकेचे काम जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.

गेल्या दहा वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुदत वाढवून देण्यात आली आहे. पण तरिसुद्धा तांत्रिक अडचणी, भूसंपादन यांसारख्या कारणांमुळे अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली.

आता या मार्गिकांच्या कामाला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरु आहे. यापूर्वीही या मार्गिकांच्या कामासाठी मोठा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये मार्गिकेच्या कामासाठी दहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

यामध्ये सध्याचे रूळ थोडे बाजूला घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या नवीन रुळांसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामंही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.


हेही वाचा

वाहतुकिचे नियम तोडल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो - नितीन गडकरी

विमानतळावर 'या' देशातून येणाऱ्यांनीच RT-PCR प्री-बुक करावी

पुढील बातमी
इतर बातम्या