मुंबईहून सकाळी साडे दहाच्या सुमारास उड्डाण घेतलेलं पवनहंस कंपनीचं हेलिकॉप्टर डहाणूजवळ समद्रात कोसळल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी जुहू विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अचानक हे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झालं होतं. या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरमधील चार व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये ओएनजीसी कंपनीचे ५ कर्मचारी आणि दोन पायलटसह सात जण प्रवास करत होते. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झालं. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी या हेलिकॉप्टरचा संबंध तुटला.
या घटनेची माहिती मिळताच ओएनजीसीने यासंदर्भात कोस्ट गार्डला कळवलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण केल्यानंतर साधारणपणे ९ किलोमीटरपर्यंत त्यांचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संबंध होता. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला.
कोस्ट गार्डने हाती घेतलेल्या शोधमोहिमेमध्ये डहाणूजवळ समुद्रात या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. त्याशिवाय चार व्यक्तींचे मृतदेह हाती लागल्याचेही सांगण्यात आले आहे.