परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या घरवापसीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून वंदेभारत अभियान (vande bharat mission) राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत १० देशांतून १३ विमानांच्या माध्यमातून १९७२ जण महाराष्ट्रात परतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिली. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवल्यानंतर त्यांच्या क्वारंटाईनची (quarantine) काटेकोर अंमलबजावणी करण्यात आल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
कुठून आले प्रवासी?
महाराष्ट्रात आतापर्यंत लंडनमधून ६५३, सिंगापूर २४३, मनिला १५०, सॅन फ्रान्सिस्को १०७, ढाका १०७, न्यूयॉर्क २०८, क्वाललंपूर २०१, शिकागो १९५, कुवेत २, आदिस अबबा ७८, काबूल १२ आणि मस्कत-ओमान इथून १६ नागरिक आले आहेत.
हेही वाचा- अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
मुंबईतील कितीजण?
यापैकी मुंबईतील प्रवाशांना विविध ठिकाणच्या हॉटेल्समध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर इतर जिल्हा व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील ८२२, उर्वरित महाराष्ट्रातील १०२५ आणि इतर राज्यातील १२५ प्रवाशांचा समावेश आहे. याव्यतीरिक्त अजून २७ फ्लाईट्सच्या माध्यमातून आणखी प्रवासी येणं अपेक्षित असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा- जनतेत विश्वास निर्माण होण्यासाठी ‘हे’ करा, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना सूचना