सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची दारे अद्याप बंदच

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या लोकल प्रवासाची दारे सामान्य प्रवाशांसाठी मात्र बंदच राहणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे कामानिमित्त कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ,वसई-विरार व अन्य भागातून ठाणे, मुंबईपर्यंत प्रवास करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले आणि सामान्यांमध्ये नाराजी उमटली. लशीची मात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांना प्रवासाच्या परवानगीबाबतही निर्णय न झाल्याने प्रवाशांच्या उद्रेकाची प्रतीक्षा करू नका, असा इशाराच रेल्वे प्रवासी संघटनांनी दिला आहे.

रस्ते वाहतुकीमुळं तासन्तास प्रवास व खिशाला कात्री लागते. यातून सुटका व्हावी म्हणून लशीची एक मात्रा किंवा दोन मात्रा घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवास करू देण्याची मागणी प्रवासी संघटनांनी राज्य सरकार व रेल्वे प्रशासनासमोर ठेवली. परंतु त्याचाही विचार राज्य सरकारकडून करण्यात आलेला नाही. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सामान्यांसाठी लोकल प्रवासाचा विचार गांर्भीयाने विचार करण्याची मागणी केली. 

लस घेतलेल्यांना परवानगी देण्याबाबत विचार शासनानं केला नाही. सध्याची परिस्थिती पाहता सामान्यांचा उद्रेक होऊ शकतो. तसे झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल याचाही विचार करण्याची गरज असल्याचे म्हणाल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या