ठाकरे सरकारला उशीरा जाग, एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि उचल देण्याची घोषणा

ऐन दिवाळीच्या तोंडावर पगाराच्या अनियमिततेला कंटाळून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यानंतर विरोधकांकडून ठाकरे सरकारवर जबरदस्त टीका होऊ लागल्यानंतर खडबडून जाग आलेल्या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्यांचा पगार आणि उचल देण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पत्रक जारी करत एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचा पगार कधी देण्यात येईल, याची माहिती दिली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी सांगितलं की, एसटी कर्मचाऱ्यांचा आॅगस्ट, सप्टेंबर आणि आॅक्टोबर अशा तीन महिन्यांचा पगार थकलेला आहे. या थकीत वेतनापैकी आॅगस्ट महिन्यातील पगार आजपासून सुमारे ९७ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. तर उर्वरित २ महिन्यांच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीआधी देण्यात येईल. उरलेल्या एका महिन्याचं वेतन देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचसोबत ज्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त अग्रीम (बिनव्याजी उचल) हवा असेल त्यांना तातडीने आग्रीम देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहितीही अनिल परब यांनी दिली.

हेही वाचा- एसटी बस कंडक्टरची आत्महत्या, ठाकरे सरकारला ठरवलं जबाबदार

एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीविषयी सांगताना अनिल परब म्हणाले की, लाॅकडाऊनच्या ५ महिन्यांच्या काळात एसटीचा सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. परंतु याकाळात एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली.

२० सप्टेंबरपासून राज्यभरात एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु झाली असली, तरी कोरोनाच्या भीतीमुळे अजूनही प्रवाशांची संख्या मर्यादीतच आहे. त्यामुळे लाॅकडाऊनआधी ६५ लाख प्रवासी वाहून नेणाऱ्या एसटीला दररोज २२ कोटी रुपये महसूल मिळायचा, पण आता प्रवाशांची संख्या रोडावून १३ लाखांवर आल्याने केवळ ७ कोटी रुपयांचा महसूल एसटीला मिळत असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. 

काळ कठीण असला तरी, आत्महत्येसारखं अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये, अशी विनंती देखील अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केली आहे.

(maharashtra transport minister anil parab announce instant salary for msrtc employees)

हेही वाचा- ‘या’ आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?- देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
इतर बातम्या