राज्यभरातील प्रवाशांना आरमदायी बससेवा देणारे एसटी महामंडळ आर्थिक तोटा सहन करत आहे. त्यामुळं आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळानं आपल्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील विविध विभागातील महाव्यवस्थापकांसह विभाग नियंत्रकांना अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. 'कोणत्याही परिस्थीतीत कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी रद्द करु नये, कारण त्या दिवसाचा पगार दुप्पट दरानं द्यावा लागतो. आगारनिहाय कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल', यांसारख्या अनेक सुचना करण्यात आल्या आहेत.
जून २०१८ मध्ये १८ टक्के भाडेवाढ करुनही उत्पन्नात वाढ न झाल्याची माहिती मिळते. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२० या कालावधीची कामगार वेतनवाढ अंमलात आणल्यानं महामंडळावर पगारवाढीचा मोठा आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळंच वाढलेला भार कमी करण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी खर्चात काटकसर करावी, अशी सूचना केली आहे.
सध्या महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं अत्यावश्यक असतील तेवढीच इमारत दुरुस्त व देखभालीची कामं करुन घेण्यात यावी. इतर कामं महामंडळाची आर्थिक परिस्थीत सुधारल्यानंतरच करावीत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता अनेक कामांना खिळ बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
मलबार हिलमध्ये कचराकुडीत सापडलं नवजात मूल
मद्याची ऑनलाइन खरेदी पडते महागात