गोव्याला जाण्यासाठी रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग तर आहेतच. पण त्यात आता आणखी एक नव्या मार्गाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. समुद्रमार्गे देखील तुम्ही आता गोवा गाठू शकता. मुंबई-गोवा फेरी बोट सेवा येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होत आहे. मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली.
'सागरमाला' योजनेअंतर्गत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत २ लाख १७ हजार कोटी रूपये गुंतवण्यात आले आहेत. ही फेरी बोट वेंगुर्ला, मालवण आणि रत्नागिरी या मार्गानं पुढे जाणार आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना या फेरीचा अधिक फायदा घेता येईल.
मुंबई-गोवा फेरी बोटसाठी सरकारचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी देखील कोकण किनारपट्टीवर ६०-७० च्या दशकात पणजी ते मुंबई फेरी बोट सेवा चालायची. रस्ते आणि हवाई मार्गाऐवजी जलमार्गाला तेव्हा अधिक प्राधान्य दिलं जायचं. १९८० पर्यंत चालणारी ही सेवा बंद झाली. कोकण शक्ती आणि कोकण सेवातर्फे ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. त्यानंतर दमानिया शिंपिगनं १९९४ साली मुंबई ते गोवा दरम्यान फेरी बोट सेवा सुरू केली. या बोटीनं मुंबईहून गोव्याला जायला ७ तास लागायचे. पण २००४ पासून ही सेवा बंद करण्यात आली.
हेही वाचा