मुंबईसह पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने या पुणे-मुंबई शहरांदरम्यान सुरू असलेली एक्स्प्रेस सेवा बंद ठेवली आहे. ही सेवा सुरू होण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई शहर-उपनगरातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. तर काही ठिकाणी रूळांना तडे गेले होते. कर्जत-लोणावळा आणि बदलापूर-कर्जत दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीला धोका निर्माण झाला होता.
त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने सावधगिरी बाळगत पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटी, सिंहगड आणि इंद्रायणी या एक्स्प्रेस बंद ठेवल्या आहेत. तर काही एक्स्प्रेस मनमाडमार्गे वळवल्या आहेत.
परिणामी पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एसटी तसंच खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. एसटीकडून जादा बस सोडण्यात येऊनही गर्दीमुळे प्रवाशांच्या हालात आणखीनच भर पडली आहे.
हेही वाचा-
रेल्वे तिकीट आरक्षण करणं महाग, २० ते ४० रुपये सेवाशुल्क लागणार
बेस्टवरील आर्थिक संकट लवकरच होणार दूर