कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय रेल्वे प्रशासनानं सर्व गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेनं प्रवास करतेवेळी प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं सर्व गाड्या रद्द केल्या. अशातच आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या तीन खासगी एक्स्प्रेस गाड्या ३० एप्रिलपर्यंत रद्द राहणार आहे.
खासगी एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आता मे महिन्याची वाट पहावी लागणार आहे. तसंच, ३ खासगी एक्स्प्रेस गाड्या ३० एप्रिलपर्यंत रद्द राहणार असून, या काळात प्रवाशांना तिकिटांच्या रक्कमेचा संपूर्ण परतावा मिळणार आहे. करोना आजार बळावल्यानंतर त्याला नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
त्यानुसार, १४ एप्रिलपर्यंत भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. १५ ते ३० एप्रिल या दरम्यान ३ खासगी एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षण बंद करण्यात आले आहे. यामुळे या काळात या गाड्या धावणार नाहीत. यामध्ये मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, लखनऊ-दिल्ली तेजस आणि वाराणसी-इंदौर काशी महाकाल एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
या काळात ज्या प्रवाशांचे आरक्षण असेल ते रद्द करण्यात येईल. संबंधित प्रवाशांना संपूर्ण परतावा देण्यात येणार असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे. त्यामुळं यंदाची सुट्टी नागरिकांची घरीच जाणार आहे.
हेही वाचा -
Coronavirus : मुख्यमंत्र्यांचे संरक्षण करणारे १०० हून अधिक पोलिस क्वारंटाइन
Coronavirus Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०००च्या वर