६ विमानतळाच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांच साखळी उपोषण

देशातील ६ विमानतळांच्या खासगीकरणाचा घाट केंद्र सरकारनं घातला होता. या खासगीकरणाला मुंबईसह देशभरातील विमानतळ कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवत थेट संप पुकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, बुधवारपासून कर्मचारी आणि अधिकारी संपावर जाणाच्या तयारीत होते. मात्र पुलवामा हल्ल्यामुळे संपाऐवजी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

लखनऊ, हैदराबाद, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम या ६ विमानतळाचं खासगीकरण करण्यात येणार होतं. मात्र, विमानतळाचं खासगीकरण होऊ नये, यासाठी मुंबईतील एएआयच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात संपाच्या दृष्टीनं गुप्त मतदान घेण्यात आलं होतं. या मतदानात तब्बल ९६ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजुनं कौल दिला होता. विमानतळाचं खासगीकरण झाल्यास विमानतळ कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचं म्हणत कर्मचाऱ्यांनी या खासगीकरणाला विरोध केला होता.

मुंबईत झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत ८५३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपैकी ७७१ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या ७७१ कर्मचारी-अधिकाऱ्यांपैकी ७४१ कर्मचारी-अधिकाऱ्यांनी संपाच्या बाजुनं कौल दिला होता. तर केवळ ३० कर्मचाऱ्यांनी संपाच्याविरोधात कौल दिला होता.


हेही वाचा

फुकट्या प्रवाशांना रेल्वे म्हणते, 'तेरा टाईम आएगा'

पुढील बातमी
इतर बातम्या