३० सप्टेंबरपर्यंत लोकल, मेल-एक्स्प्रेस सेवा बंद? रेल्वेने केला खुलासा

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत लोकल वाहतूक, मेल आणि एक्स्प्रेस सेवा बंद राहणार असल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. परंतु हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे. रेल्वे प्रशासनाने असं कुठल्याही प्रकारचं पत्रक काढलेलं नाही, असा खुलासा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेला आहे. (railways has cancelled all regular trains till 30th september is not correct says ministry of railways)

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून देशभरात नियमित स्वरूपात चालवण्यात येणाऱ्या लोकल, मेल आणि एक्स्प्रेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ परप्रांतीय मजुरांसाठी मध्यंतरीच्या काळात मोठ्या संख्येने श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात आल्या तर, मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादीत स्वरूपात लोकल ट्रेन चालवण्यात येत आहेत. त्याव्यतीरिक्त इतर सर्व सेवा बंदच ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - पश्चिम रेल्वेचं १९५९ कोटींचं नुकसान

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून या निर्णयाला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु ही मुदतवाढ ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आली असून तसं परिपत्रक रेल्वे प्रशासनाने जारी केल्याचं वृत्त सोशल मीडियावर पसरलं होतं. पूर्व रेल्वेच्या चीफ पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन मॅनेजरच्या (CPTM)नावे जारी करण्यात आलेल्या तथाकथित मेलमुळे सोशल मीडियावर अफवा पसरल्या आहेत. 

त्याचं रेल्वे मंत्रालयाकडून खंडन करण्यात आलं आहे. काही प्रसारमाध्यमांनी ३० सप्टेंबरपर्यंत लोकल वाहतूक, मेल आणि एक्स्प्रेस बंद राहणार असल्याचं पत्रक आल्याचं सांगितलं. मात्र हे वृत्त चुकीचं आहे. अशा प्रकारचं कोणतंही पत्रक रेल्वेकडून काढण्यात आलेलं नाही. विशेष मेल-एक्स्प्रेस ट्रेन्स सुरूच राहतील, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - Mumbai Rains : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद, या मार्गावरून वळवली वाहतूक

पुढील बातमी
इतर बातम्या