मुंबई ते नाशिक असा एक्स्प्रेस ट्रेनने किंवा कार, वा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण लवकरच मुंबई (कल्याण) ते नाशिक दरम्यान नियमीत लोकलसेवा सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या निर्देशानुसार मध्य रेल्वेने या लोकल सेवेसाठी चाचणीला सुरूवात केली आहे. ही लोकल सुरु करण्यासाठी रेल्वेच्या 'रिसर्च स्टॅण्डर्ड अॅण्ड डिझाइन ऑर्गनायझेशन' (आरडीएसओ) ने नुकतीच या मार्गाची पाहणी केली असून या मार्गातील अडथळ्यांची देखील नोंद घेतली आहे.
‘आरडीएसओ’च्या पाहणीनुसार, मुंबई-नाशिक मार्गावर कसारा-इगतपुरी दरम्यानचा घाट लोकल सेवाकरीता अडथळ्याचा ठरत अाहे. या मार्गावरील तांत्रिक अडचणी आणि घाट परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात ‘आरडीएसओ’ने मध्य रेल्वेला काही सूचना केल्या.
मुंबई-नाशिक हा मार्ग घाटातून जात असल्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल होणाऱ्या लोकल गाड्यांना मोठ्या क्षमतेची ब्रेकयंत्रणा बसवणं आवश्यक आहे. लोकलचे दरवाजे मोठे असणं आवश्यक आहे. लोकलमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल चालवणं गरजेचं आहे. या सूचनांचा यांत समावेश आहे. त्यानुसार मध्य रेल्वेनं चेन्नईतील 'इंटिग्रल कोच' कारखान्याकडे अशा कोचसाठी विचारणाही केली आहे.
दररोज हजारो प्रवासी नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई-नाशिक मार्गावर प्रवास करतात. या प्रवाशांसाठी सध्या केवळ पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस अशा दोन-चार एक्स्प्रेसनंच प्रवास करावा लागतो. त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-नाशिक प्रवासासाठी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास मुंबई-नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलास मिळणार आहे.
हेही वाचा-
नाशिक-कल्याण लोकलची येत्या १५ दिवसांत चाचणी
बेस्ट उपक्रमात दाखल होणार ८० इलेक्ट्रिकल मिडी बस