नाहीतर, मुंबई विमानतळ बंद करू, भारतीय कामगार सेनेचा इशारा

जेट एअरवेज पूर्णत: आर्थिक गाळात गेल्याने या कंपनीत काम करणाऱ्या साडेबावीस हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेऊन १० मे पर्यंत तोडगा काढावा, नाहीतर आम्ही मुंबईतील दोन्ही विमानतळ बंद करू, असा इशारा भारतीय कामगार सेनेचे सूर्यकांत महाडिक यांनी दिला आहे. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला.

८०० कोटींचा व्यवसाय

जेटची १२० विमाने उभी असल्याने कंपनीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे ८०० कोटींचा व्यवसाय परदेशी कंपन्यांच्या ताब्यात गेला आहे. इतर कंपन्यांनी छोट्या शहरांमधली विमानं रद्द करून ती मोठ्या शहरांकडे वळवल्याने तिकिटांचे दर वाढलेत. परिणामी विमान प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.

सेवा सुरू करा

जेट बंद पडल्याने कंपनीचे पायलट, केबिन क्रू, इंजिनिअर्स, ग्राऊंड स्टाफ, नोडर्स यांना इतर विमान कंपन्या तुटपुंज्या पगारात नोकरी करण्यास भाग पाडत आहेत. हा कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत जेटची सेवा सुरू झाली पाहिजे. त्यासाठी बँकांनी जेट एअरवेजला आर्थिक मदत करण्याचे केंद्र सरकारने आदेश द्यावेत, अशी मागणी महाडिक यांनी केली.

१० मे पर्यंत जेट कंपनीच्या शेअर्सच्या लिलावाचा निर्णय झाला नाही, तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा महाडिक यांनी दिला आहे.


हेही वाचा-

जेटच्या प्रवाशांसाठी एअर इंडियाची खास सवलत

पगार द्या, तेव्हाच हटू, जेट एअरवेजच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या


पुढील बातमी
इतर बातम्या