शनिवारी आणि रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची कर्जत ते बदलापूर स्थानकादरम्यानची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं ही वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनानं घेतला होता. तसंच ही वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी मंगळवार उजाडण्याची शक्यता देखील मध्य रेल्वेनं वर्तवली होती. मात्र अखेर मंगळवारी सकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्वपदवर आली आहे. त्यामुळं कर्जहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मंगळवारी पहाटे ४.४८ वाजता सीएसएमटी ते कर्जत ही पहिली लोकल सुटली. त्यानंतर, ५.५३ वाजता कर्जतहून सीएसएमटीला जाणारी लोकल सुटली. ठाण्याहून कर्जतसाठी लोकल पहाटे ५ वाजता सुटली. त्यामुळे आता या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
मध्य रेल्वेच्या अनेक ठिकाणी रुळांवरची माती, खडी वाहून गेली होती. मात्र रविवारी रात्री पावसावं विश्रांती घेतल्यानं मध्य रेल्वे प्रशासनानं तातडीनं हा मार्ग पर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर अखेर २ दिवसांच्या प्रयत्नांनंतर या मार्गावरुन लोकल धावली. याबाबत मध्य रेल्वेने ट्विट करत माहिती दिली आहे. तसंच, कर्जत बदलापूर मार्ग आता पूर्वपदावर आला आहे.
हेही वाचा -
कलम ३७० चा परिणाम शेअर बाजारावर, सेन्सेक्स, निफ्टी कोसळले