मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास जलद, वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन

मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान कनेक्टिव्हिटी देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुंबई वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन गुरुवारी, १७ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेलापूर इथल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नव्यानं बांधलेल्या बेलापूर जेटीचे उद्घाटन करण्यात आले. दुसरीकडे केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी वॉटर टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला.

या प्रकल्पावर काम करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (एमएमबी) आणि सिडको एकत्र आले होते. अहवालानुसार, बेलापूर जेट्टीवरील काम २०१९ मध्ये सुरू झाले आणि सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण झाले. यासाठी ८.३७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

७५ कार आणि ८५ दुचाकींसाठी पार्किंग क्षेत्रासह सुसज्ज, वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी तीन वॉटर टॅक्सी मार्ग कसे अंतिम केले गेले आहेत, यासंदर्भाची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

बेलापूर इथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे.

बेलापूर इथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का इथं पोहोचण्यास स्पीड बोटीनं फक्त ३० मिनिटं तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

स्पीडबोटीचं भाडं प्रति प्रवासी ८०० ते १२०० रुपये तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी २९० रुपये इतकं ठेवण्यात आलं आहे. बेलापूर इथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालवण्यात येणार आहे.

या वॉटर टॅक्सी सेवेमुळं नवी मुंबईत निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुद्धा जोडणी मिळणार आहे. नवी मुंबईमधून थेट एलिफंटा इथं जाण्यासाठी सेवा मिळणार असल्यानं पर्यटनालासुद्धा चालना मिळणार आहे.


हेही वाचा

हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार 'या'वर्षी होणार

एकाच कार्डवर लवकरच करता येणार बेस्ट, रेल्वे आणि मेट्रोचा प्रवास

पुढील बातमी
इतर बातम्या