शिवरायांच्या शौऱ्याचं आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचं प्रतिक असणाऱ्या गड-किल्ल्यांबाबत प्रत्येक मराठी मनाला आस्था असते. याच गड-किल्ल्यांवर तब्बल १० वर्ष भटकंती करून १०० हून अधिक गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास चित्रकार हरेष पैठणकर यांनी आपल्या चित्रातून मांडला आहे.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा ठेवा चित्रकार हरेष पैठणकर यांनी 'रंग सह्याद्री' या संकल्पनेतून चित्रस्वरुपात सर्वांच्या भेटीला आणला आहे. मुंबई इथल्या जंहागीर आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन ९ ते १५ मार्च दरम्यान भरलं आहे. महाराष्ट्रात साडेतीनशेहून अधिक गड-किल्ले आहेत. यातील १०० हून अधिक गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास त्यांनी आपल्या चित्रातून मांडला आहे.चित्रकार हरेष पैठणकर हे मागील १० वर्षांपासून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यावर भटकंती करत आहेत. त्यांची ही भटकंती २००७ ते २००८ सालापासून सुरू आहे. राज्यातील १३ जिल्ह्यातील जवळपास १०० गड-किल्ल्यांची चित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. हरेष यांनी आतापर्यंत ११५ ते ११६ गड-किल्ल्यांची पायी भटकंती केली आहे.
महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशा ऐतिहासिक वारसांमधून आपल्या महाराष्ट्राच्या पराक्रमाची, लढवय्या बाण्याची ओळख पटते. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेले गड-किल्ले बघितले तर ही ओळख जास्त अधोरेखित होते. वर्षानुवर्षे अंगावर ऊन, पाऊस, वारा झेलत हे गड-किल्ले आजही सक्षमपणे उभे आहेत. मात्र, काळाच्या ओघात आता या ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काही गड-किल्ल्यांची पडझड सुरू आहे. या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणं आता गरजेचे आहे. त्यामुळेच हे चित्रप्रदर्शन भरवल्याचे हरेष पैठणकर यांनी सांगितलं.
हेही वाचा