सप्टेंबर महिन्यात सर्व आयआयटींची शिखर संस्था असलेल्या ऑल इंडिया आयआयटी कौन्सिलनं शुल्कवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, ऑल इंडिया आयआयटी कौन्सिलनं एमटेकच्या शुल्कात वाढ केली. २५ ते ५० हजारांवरून २ लाख रुपये इतकी वाढ केल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, या शुल्कवाढीचा निषेध म्हणून प्रथमच देशभरातील आयआयटीचे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत.
ऑल इंडिया आयआयटी कौन्सिलने शुल्कवाढीचा निर्णय घेतला. हा निर्णय मागे घ्यावा व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारी अनेक पत्रं विद्यार्थ्यांनी संस्थेचे संचालक तसंच, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडंही धाडली आहेत. आयआयटीमध्ये होणारी खोगीरभरती कमी व्हावी, या उद्देशानं ही शुल्कवाढ करण्यात येत असल्याचं कौन्सिलनं स्पष्ट केलं आहे.
केवळ पदव्युत्तर पदवी मिळावी या उद्देशानं अनेक विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश घेतात यामुळं चांगल्या व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कौन्सिलनं म्हटलं होतं. त्याशिवाय संस्थेच्या खर्चाचा हवाला देत शुल्कवाढ आवश्यक असल्याचं कौन्सिलनं नमूद केलं.
मात्र ही शुल्कवाढ म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची संधी हिरावून घेण्यासारखे असल्याचं विद्यार्थ्यांचं मत आहे. यामुळे ही शुल्कवाढ मागे घ्यावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. देशभरातील आयआयटीमध्ये विविध स्तरावर आंदोलनं केली जाणार आहेत. देशात २३ आयआयटीमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण शिकवलं जात आहे.
हेही वाचा -
'मेट्रो-३'च्या कामामुळं 'या' इमारतीला तडा
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी, रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही