मुंबई विद्यापीठानं पुनर्मूल्यांकनातून २०१८- १९ या वर्षांत २ कोटी ३६ लाख ३९ हजार ८८० तर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींमधून ६ लाख ७७ हजार ४४ रुपये कमावल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलं आहे. पुनर्मूल्यांकनासाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४५.४५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सत्रामध्ये १५४ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावरून पेपर तपासणीतील ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
२०१५ ते २०१७ या वर्षात पुनर्मूल्यांकनातून मुंबई विद्यापीठाला ४ कोटी ८३ लाख इतकी रक्कम मिळाली होती. २०१७-१८ मध्ये ती ३ कोटी ४९ लाख इतकी झाल्याचं समोर आलं. तर आता २०१८-१९ या वर्षांत ही रक्कम २ कोटी २६ लाख इतकी झाली आहे. याचप्रमाणे छायांकित प्रतींमधून २०१५ ते २०१७ या कालावधीत विद्यापीठाला १५ लक्ष ३२ हजार तर २०१७-१८ दरम्यान १३ लाख ६९ हजार इतकी रक्कम मिळाली. २०१८-१९ या वर्षांत ही रक्कम ६ लाख ७७ हजार ४४० इतकी असल्याची माहिती मिळते.
२०१८ च्या अर्ध्या सत्राच्या अहवालानुसार ४५ टक्के विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाले आहेत. याआधीही एप्रिल २०१४ ते आॅगस्ट २०१६ दरम्यान मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.