शिवरायांच्या शौऱ्याचं आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचं प्रतिक असणाऱ्या गड-किल्ल्यांबाबत प्रत्येक मराठी मनाला आस्था असते. याच गड-किल्ल्यांवर तब्बल १० वर्ष भटकंती करून १०० हून अधिक गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास चित्रकार हरेष पैठणकर यांनी आपल्या चित्रातून मांडला आहे.
चित्रकार हरेष पैठणकर हे मागील १० वर्षांपासून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यावर भटकंती करत आहेत. त्यांची ही भटकंती २००७ ते २००८ सालापासून सुरू आहे. राज्यातील १३ जिल्ह्यातील जवळपास १०० गड-किल्ल्यांची चित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. हरेष यांनी आतापर्यंत ११५ ते ११६ गड-किल्ल्यांची पायी भटकंती केली आहे.
महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशा ऐतिहासिक वारसांमधून आपल्या महाराष्ट्राच्या पराक्रमाची, लढवय्या बाण्याची ओळख पटते. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेले गड-किल्ले बघितले तर ही ओळख जास्त अधोरेखित होते. वर्षानुवर्षे अंगावर ऊन, पाऊस, वारा झेलत हे गड-किल्ले आजही सक्षमपणे उभे आहेत. मात्र, काळाच्या ओघात आता या ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काही गड-किल्ल्यांची पडझड सुरू आहे. या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणं आता गरजेचे आहे. त्यामुळेच हे चित्रप्रदर्शन भरवल्याचे हरेष पैठणकर यांनी सांगितलं.
हेही वाचा