मुंबई उपनगरात प्रवाशांना रिक्षाद्वारे सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवली जाते. मात्र, अनेक मुजोर रिक्षा चालक हे प्रवाशांसोबत गैरवर्तन करतात, जवळच्या भाड्याला नकार देतात. त्यामुळं प्रवाशांची गैर सोय होते. तसंच, अनेकदा या कारणांमुळं रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. अशा या मुजोर रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारावर आळा घालण्यासाठी परिवहन विभागानं ८५० रिक्षा चालकांचे परवाने मागील ५ महिन्यात रद्द केले आहेत. त्याशिवाय, या चालकांना नव्यानं परवाना मिळणार नाही याची दखलही विभागानं घेतली आहे.
मागील पाच महिन्यांत ४ हजार १३० चालकांचे परवाने आरटीओनं ताब्यात घेतले. त्यामधील ८५० जणांचे परवाने रद्द केले आहेत. मुंबईतील कुर्ला, वांद्रे आणि बोरिवली या भागांमध्ये आरटीओतर्फे सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. मुजोर रिक्षा चालकांबाबत प्रवाशांच्या सतत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेत आरटीओनं फेब्रुवारी महिन्यात कारवाईला सुरूवात केली. सुरुवातीला कुर्ला टर्मिनस, वांद्रे पूर्व व पश्चिम स्थानकाबाहेरील रिक्षा चालकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली, त्यानंतर घाटकोपर, मुलुंड, विमानतळ, बोरीवली स्थानकाबाहेरील चालकांवर कारवाई करण्यात आली.
आरटीओनं केलेल्या कारवाईदरम्यान रिक्षा चालकांकडं बिल्ला, परवाना नसल्याची बाब समोर आली. सकाळी ६ ते दुपारी २, सायंकाळी ४ ते रात्री १०, सकाळी ७ ते दुपारी १ या वेळांमध्ये ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली.
हेही वाचा -
रोइंगपटू दत्तू भोकनळला दिलासा, कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी लालचंद राजपूत यांचा अर्ज