भारताचा आंतरराष्ट्रीय रोइंगपटू (olympian rower) दत्तू भोकनळ (dattu bhokanl) विरोधातील कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने त्याला मोठा दिलासा दिला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलेनं भोकनळविरोधात तक्रार केल्याने त्याच्याविरोधात ४९८(अ) कलमाखाली कौटुंबिक हिंसाचाराचा (domestic violence) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तक्रारदाराच्या आरोपात तथ्य दिसत नसल्याचं नमूद करत न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला.
आशा दत्तू भोकनळ असं या तक्रारदार महिलेचं नाव आहे. ही महिला सध्या नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २२ डिसेंबर २०१७ ते ३ मार्च २०१९ या कालावधीत दत्तू आणि तिच्यात प्रेमसंबंध होते. आडगाव इथल्या नाशिक पोलीस मुख्यालय आणि पुण्यातील रोइंग रोड इथं ते एकमेकांना भेटले. या दरम्यान दत्तूने तक्रारदाराशी लग्न केलं. परंतु या लग्नाची माहिती त्याने कुटुंबाला दिली नाही.
त्यामुळे सर्वांसमक्ष लग्न करण्यासाठी तक्रारदाराने तगादा लावला. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी लग्न करण्यास दत्तू राजी झाला. तक्रारदाराच्या कुटुंबियांनी लग्नाची तयारी देखील सुरू केली. परंतु दत्तून काहीतरी कारण देत हे लग्न पुढं ढकललं. त्यानंतर पुन्हा एकदा २४ फेब्रुवारी ही लग्नाची तारीख ठरवण्यात आली.
विवाहाची तारीख दोनदा ठरवूनही तो विवाहाला उपस्थित राहिला नाही आणि त्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. मात्र यावेळेही दत्तू उपस्थित राहीला नाही. त्यामुळे दोनदा लग्नाची तारीख ठरवूनही लग्नाला उपस्थित न राहिल्याने फसवणूक झाल्याचा आरोप करत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सोबतच दोघांच्या सहमतीने लग्न होऊनही दत्तूने आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचंही तक्रारदार महिलेने म्हटलं आहे.
हेही वाचा-
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी लालचंद राजपूत यांचा अर्ज
धक्कादायक! पृथ्वी शॉ ८ महिन्यांसाठी निलंबित, खोकल्याचं औषध प्यायल्याची कबुली