मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. यामुळे अनेक शहरं जलमय झाली आहेत. मुंबईत अजून चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असून बुधवारपर्यंत मुंबईत दमदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
पश्चिम बंगालच्या खाडी क्षेत्रामध्ये दबाव वाढल्यामुळे आसपासच्या परिसरात पावसानं जोर पकडला असून यामुळे मुंबई आणि मुंबईलगतच्या परिसरात तसेच उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुढील चार दिवस मुंबईकरांसाठी मुसळधार पावसाचे असणार आहेत.
शुक्रवार पासून सुरु झालेला पाऊस शनिवारी रात्री पर्यंत अखंडपणे सुरूच होता. रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे मुंबईच्या हिंदमाता, भांडूप, सायन, कल्याण अशा अनेक भागात पाणी साचले. यामुळे बेस्टलाही आपला मार्ग बदलावा लागला.
समुद्रात येणाऱ्या भरती आणि मोठ्या लाटांपासून सुरक्षेसाठी प्रशासनाकडून जुहू चौपाटीवर सुरक्षा वाढवण्यात आली. भरतीदरम्यान लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी 2 टॉवरसुद्धा उभारण्यात अाले आहेत. लाईफगार्डच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत पावसामुळे जवळपास ३० लोंकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाण्यात वाहून गेल्यामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सर्वात जास्त आहे.
पालघर जिल्ह्यातील वसईच्या चिंचोटी धबधब्यावर सहलीकरिता गेलेल्या एका पर्यटकाचा शनिवार मृत्यू झाला तर एनडीआरएफ जवान, अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांनी मिळून अडकलेल्या जवळपास १०० लोंकाचे जीव वाचवले अाहेत. यापैकी ३५ जण झाडांना धरून उभे होते. तब्बल पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या सर्व लोकांना वाचवण्यात यश आलं.
हेही वाचा -
मुंबईत पावसाचा जोर वाढणार - हवामान विभाग
राणीबागेत येणार नवा पाहुणा, पेंग्विन देणार गोड बातमी