अमरावती : वर्धा नदीत बोट उलटली, एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अमरावतीतल्या वरूड तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकानं सुरू केला आहे.

गाडेगाव मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक सोमवारी पोहचले होते. सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर मंगळावरी सकाळी सर्व जण श्री क्षेत्र झुंज इथं पोहचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली. त्यात कुटुंबातील अकरा जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे.

घटनास्थळी मदत आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. आतापर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीनं इतरांचा शोध सुरू आहे.

स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. “वर्धा नदीच्या तिरावर ही घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनासह स्थानिक लोक उपस्थित आहेत. यामध्ये ११ जण बुडाले असून तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहे. उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे,” असं स्थानिक आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.

“नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या संगमवार हे ठिकाणी आहे. झुंज या पर्यटन क्षेत्रावर या महिन्यात हजारो भाविक येत असतात. नदीचे पात्र मोठे असल्यानं तिथे बोटींग करण्यात येतं. क्षमतेपेक्षा जास्त लोकं या बोटीमध्ये बसल्यामुळे ती उलटली असल्याचा अंदाज आहे. दशक्रिया विधीसाठी जमलेल्या एकाच कुटुंबातील लोक या बोटीतून प्रवास करत होते”, अशी माहिती देवेंद्र भुयार यांनी दिली.


हेही वाचा

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने केला ब्रश; १८ वर्षीय मुलीचा मृत्यू

धक्कादायक! मुंबईत यावर्षी जुलैपर्यंत ५५० बलात्काराचे गुन्हे दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या