एसटी महामंडळाचा तोटा ६ हजार कोटींपेक्षा अधिक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील विविध भागात सुविधा सुरू करण्यात आल्या. त्यानुसार, वाहतूक सेवाही सुरू करण्यात आली. एसटी महामंडळानं राज्यातील नॉन रेड झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत एसटीची सेवा २२ मेपासून सुरू केली. निवडक मार्गांवर या फेऱ्या होत आहेत. सध्याच्या नियमाप्रमाणं प्रत्येक फेरीमध्ये २२ प्रवाशांची आसन क्षमता असताना प्रत्यक्षात सरासरी फक्त ७ प्रवासीच प्रवास करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक एसटी डेपोमध्ये उत्पन्नापेक्षा डिझेल आणि नियोजनाचा खर्च अधिक होत आहे.

लॉकडाऊनच्या आधी दररोज २२ कोटींचं उत्पन्न मिळविणाऱ्या एसटी महामंडळाला सध्या केवळ ४ ते ६ लाखांच्या उत्पन्नावर समाधान मानावं लागत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर प्रवास करणं टाळत आहेत. त्यामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये रिकाम्या बस फिरत आहेत. तर, काही बस ४ ते ५ प्रवाशांना घेऊन धावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचा तोटा ६ हजार कोटींपेक्षा जास्त वाढला आहे.

मुंबई, पालघर, ठाणे येथील अत्यावश्यक सेवा वगळता राज्यभरातील एसटी सेवा २ महिने बंद होती. त्यानंतर एसटीची जिल्ह्यांतर्गत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मे या पहिल्याच दिवशी ४५७ गाड्यांचा वापर करीत निवडक मार्गांवर २ हजार ७ फेऱ्या झाल्या. यातून ११ हजार १५१ प्रवाशांनी प्रवास केला. तेव्हापासून २६ मेपर्यंत निवडक मार्गांवर ३,११८ बस चालविण्यात आल्या. यामध्ये १४,२८२ फेऱ्यांद्वारे ९३,३९३ प्रवाशांनी प्रवास केला.


हेही वाचा -

राज्यात १५ जूनपासून शाळा होणार सुरू

भारत- ऑस्ट्रेलियामध्ये ३ डिसेंबरपासून पहिली कसोटी


पुढील बातमी
इतर बातम्या