दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात दोन्ही इनिंगमध्ये दमदार सेंच्युरी ठोकणारा भारताचा सलामीवीर रोहीत शर्मा आता आरे काॅलनीतील झाडांच्या कत्तलीविरोधात बॅटींग करण्यासाठी सज्ज झाला आहे. आरेचं अस्तित्व नष्ट करून कसं चालेल? असा प्रश्न विचारत त्याने मेट्रो प्रशासनाच्या कारवाईवर बोट ठेवलं आहे.
“जीवनात ज्या वस्तूंची अत्यांतिक आवश्यकता असते, अशा गोष्टी नष्ट करून कसं चालेल? मुंबईत हरितपट्टा तयार करण्यासाठी आणि वातावरण संतुलित ठेवण्यात ‘आरे’ने मोलाचा वाटा उचलला आहे. असा अत्यंत महत्वाचा असलेला मुंबईतील हरितपट्टा नष्ट करणं पूर्णपणे चुकीचं आहे. प्रशासनाच्या या कृतीमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचं वेगळं नमूद करायची गरज नाही”, या शब्दांत रोहितने मेट्रो प्रशासनाच्या कारवाईवर टीका केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरणप्रेमींच्या याचिका फेटाळून लावतानाच मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेड (MMRCL)ने रातोरात आरेतील २ हजारांहून अधिक झाडांची कत्तल केली. ही कारवाई रोखण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या २९ पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करत वृक्षतोडीच्या कामाला २१ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
हेही वाचा-
धक्कादायक वास्तव! २ दिवसांत आरेतील 'इतक्या' झाडांची कत्तल!!
आरेतील वृक्षतोड ताबडतोब थांबवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश