मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या आरेतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास स्थगिती दिली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता सर्वेच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळं पर्यावरणप्रेमींसह अनेकांना दिलासा मिळाला आहे.
विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं रिषभ रंजन या विद्यार्थ्यानं एका पत्राद्वारे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचं याकडं लक्ष वेधलं होतं. या विद्यार्थ्यांच्या पत्राचं जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी १० वाजता या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीसाठी न्या. अरुण मिश्रा आणि न्या. अशोक भूषण यांचं २ सदस्यीय विशेष पीठ गठित करण्यात आलं होतं. यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
सुनावणीवेळी न्यायालयानं आरेतील वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली. 'आरेतील झाडं तोडायला नको होती. आरेतील वृक्षतोड तात्काळ थांबवा’, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्याशिवाय, आरेतील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांना अटक करण्यात आली होती. या ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनाही तात्काळ मुक्त करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहे. तसंच, पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे ठेवण्याचे आदेश देत न्यायालयानं वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.
हेही वाचा -
आरेतील वृक्षतोड प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
'आरे वृक्षतोड'प्रकरण: अटक झालेल्या 'त्या' पर्यावरणप्रेमींना जामीन मंजूर