आरे कॉलनीमधील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आरे कॉलनीपरिसरात पर्यावरणप्रेमींसह अनेकांना आंदोलन केलं त्यावेळी आंदोलन करणाऱ्या २९ पर्यावरणप्रेमींना शनिवारी पोलीसांनी अटक केली होती. मात्र, या पर्यावरणप्रेमींना रविवारी बोरिवली सुट्टीकालीन सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला. पुन्हा आंदोलनात सहभागी होऊ नये आणि १५ दिवसांतून एकदा पोलिसांसमोर हजर व्हावं, अशा अटींवर न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला.
या आंदोलकांना प्रत्येकी ७ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. पुन्हा आंदोलन करणार नाही, तसेच १५ दिवसांतून एका बुधवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, तपास अधिकारी पोलिस ठाण्यात बोलावतील, त्यावेळी हजेरी लावावी, अशा अटी त्यासाठी घालून देण्यात आल्या.
मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील झाडे तोडण्याच्या निर्णयाविरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासूनच वृक्षतोड करण्यास सुरूवात झाली. या वृक्षतोडीला विरोध दर्शवत शुक्रवारी रात्रीपासून आरेमध्ये आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी आंदोलक पर्यावरणप्रेमींवर सरकारी काम रोखणं, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, एकाच हेतूनं बेकायदा एकत्र येणं या कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले.
गंभीर कलमांमुळं त्यांना बोरिवली दंडाधिकारी न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. परंतु,तुरुंगात रवानगी झालेल्या २९ जणांमध्ये बहुतांश विद्यार्थी, तरुण व तरुणी आहेत, हे लक्षात घेत त्यांच्या जामिनाची मागणी पालकांतर्फे सत्र न्यायालयास करण्यात आली. न्यायाधीश एच. सी. शेंडे यांनीही, या आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्यानं त्यांना तुरुंगात ठेवण्याची गरज नाही, असा निष्कर्ष नोंदवत जामीन मंजूर केला.
हेही वाचा -
आरेतील वृक्षतोडीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
मुंबईत ४६ टक्के विद्यार्थी पाहतात पॉर्न व्हिडीओ