मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव काठोकाठ भरत आल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता दूर झाली आहे. या सातही तलावांत वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे.
एवढंच नाही, तर गेल्या ३ वर्षांच्या तुलनेत यावर्षी आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक जलसाठा जमा झाला आहे. यावर्षी या सातही तलावांमध्ये (Lake) सद्यस्थितीत १,३०१,९८४ दशलक्ष लिटर पाणी (९० टक्के) जमा झालं आहे. २०१८ मध्ये याच वेळेस तलावांमध्ये १,२१८,६९२ दशलक्ष लिटर (८४ टक्के) आणि २०१७ मध्ये १,२५५,९९२ दशलक्ष लिटर (८७ टक्के) पाणी जमा झालं होतं.
या पाणीसाठ्यात १० टक्क्यांची भर पडल्यास तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा होईल. या सातही तलावांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता १,४४७,३६३ दशलक्ष लिटर एवढी आहे. पुढच्या काही दिवसांत पाऊस असाच पडत राहिल्यास ही कसर भरून निघेल, असं महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने मुंबईकरांना पावसाळ्यापर्यंत पाणी वापरता यावं म्हणून महापालिकेने नोव्हेंबर २०१८ पासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु या पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांना सप्टेंबर २०२० पर्यंत कुठलीही पाणीकपात न करता आरामात पाणीपुरवठा करता येईल.
हेही वाचा-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ८५.६८ टक्के पाणीसाठा जमा
मुंबईत जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद