सफाई करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या ५ जणांचा मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना कल्याणमध्ये घडली अाहे. कल्याणमधील नेतीवली लोकग्राममधील विहिरीत सफाई करण्यासाठी उतरलेले ३ जण बुडाले. तर त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या अग्निशमन दलाच्या २ जवानांचाही बुडून मृत्यू झाला.
लोकग्राम परिसरात रस्त्यालगत एक विहिर असून या विहिरीतलगत एक नाला अाहे. या नाल्यातील रसायनमिश्रीत पाणी विहिरीत मिसळले अाहे. त्यामुळे विहिरीत साचलेला रसायनांचा गाळ काढण्यासाठी गुरूवारी सकाळी तिघे जण अाले होते. अगोदर विहिरीत एक कामगार उतरला होता. मात्र, तो बुडाल्याचे लक्षात अाल्यावर त्याला वाचवण्यासाठी अाणखी दोघे विहिरीत उतरले. मात्र, ते दोघेही विहिरीत बुडाले.
अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच एक पथक या ठिकाणी पोहोचले. अग्निशमनचे २ जवान कामगारांना बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरले. मात्र, या दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला. अाता अग्निशमन दलाचे एक पथक सेफ्टी बेल्ट आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन घटनास्थळी पोहोचले आहे. या आधारे पाच जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हेही वाचा-
गेट वे ऑफ इंडियाजवळ महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
हिना’, ‘विकी’ मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त